Wednesday, October 23, 2013

मालिकेचा पर्यायी, माध्यमाचा प्रभाव !!!

      संवादाच्या 'कल्टीवेशन' सिद्धांता नुसार,  व्यक्ती जर एखादी मालिका  खूप आत्मीयतेने बघत असेल.जर लोकांवर माध्यमाचा,मालिकेचा खूप मोठा पगडा असेल तर ती मालिका, त्या मालिकेतील पात्र लोकांना त्यांच्या आयुष्याचा एक भाग वाटू लागतात,मालिकेत घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या घटना त्यांच्या आयुष्याला प्रभावित करत असतात.आणि याच सिद्धांताचा प्रत्यय सध्या झी वर सुरु असणाऱ्या "होणार सून मी ह्या घरची" या मालिकेच्या निमित्ताने येतोय.
सध्या मराठी मनावर  या मालिकेने गारुड घातलय.याला कारण त्या मालिकेचा फ्रेश लूक, खऱ्या स्थळांवर होणार शूट,आणि पठडीतल्या मालिकांपेक्षा एक तरल प्रेमकहाणी या मालिके मुळे लोकांना पाहता येते.
    या मालिकेची लोकप्रियतेचा अंदाज फेसबुक या सोशल नेट्वर्किंग साईट वरील  मालिकेच्या वेब पेज वर मालिकेतील पात्रांना मिळणाऱ्या हजारो हिट्स आणि लाईक्स मधून येतो.
    मालिकेने  आणि पर्यायी त्यातील पात्रांनी प्रेक्षकांना इतकी भुरळ घातलेय की , त्यांच्यासोबत फोटो काढायला,त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आणि त्यांचे अभिनंदन करायला लोक अफाट गर्दी करतात.
     या मालिकेत जान्हवीच्या (मध्यवर्ती पात्र ) भावाची भूमिका साकारणारा रोहन गुजर हा आमचा कॉलेज पासूनचा मित्र..हल्ली त्याच्या सोबत फिरताना मालिकेच्या प्रसिद्धीचा प्रत्यय येतो.गणपतीत माझ्या गावी गेलो होतो तेव्हा त्याला पाहण्यासाठी,त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांनी एकाच गर्दी केली होती.वास्तविक तो माझ्या गावी येण्याची ही पहिली वेळ मुळीच नव्हती.तेव्हा त्याच्याकडे फारस लक्ष नसणाऱ्या याच लोकांनी आता त्याच्या भोवती गर्दी केली होती...माध्यमाचा प्रभाव!! इतर काय...आणि माध्यमचा विस्तार देखील  कळून येतो या घटनेतून...म्हणजे मालिकेने लोकप्रियतेच्या बाबतीत गाव,शहर,राज्य,देश या सीमा ओलांडल्या आहेत.
       लालबागच्या राजाला गेलो तेव्हा देखील हाच अनुभव.मुळात गणेशोत्सवात लालबाग-परळ भागात रात्रभर हजारोंच्या संख्येने लोक वावरत असतात...प्रचंड गर्दी.परंतु त्या गर्दीतही लोकांनी याला ओळखावे,फोटो काढावेत,अनेक प्रश्न विचारावेत,शुभेच्छा द्याव्यात याच त्याच्या सह आम्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होत.


           
        खर तर मालिकेच्या बाबतीत लोक  पात्र साकारणाऱ्या कलाकारांपेक्षा त्या मालिकेतील पात्रांवर प्रेम करत असतात.ते पात्र त्यांना जवळच वाटत असत. आपल्यातलच एक वाटत असत.पिंट्याच पात्र देखील लहान मुलांमध्ये जास्त लोकप्रिय आहे त्याच कारण  म्हणजे त्या पात्रांची बांधणी...मस्ती करणारा, अभ्यासाचा कंटाळा असणारा,बेशिस्त परंतु बहिणीच्या बाबतीत हळवा,प्रोटेक्टिव असा पिंट्या लहान आणि तरुण मुलांना भावण  स्वाभाविक आहे कारण  तो कुठेतरी त्यांना प्रतिबिंबित करत असतो.
        मालिकेतील जान्हवी आणि श्री ही आदर्शवादी पात्र आहेत.त्या दोघांविषयी महिला वर्गाकडून आलेल्या प्रतिक्रिया म्हणजे," अशी मुलगी किंवा मुलगा आम्हाला असाव अस वाटत." " आमच्या मुली ला देखील श्री सारखा  नवरा मिळावा म्हणजे आम्ही सुटलो" "श्री मध्ये आम्ही आमचा मुलगा पाहतो." मालिकेतील व्हिलन खऱ्या आयुष्यातही वाईटच असेल असा समाज आहे लोकांचा.


      एकूणच माध्यम लोकांवर किती प्रचंड प्रभाव टाकते याच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही मालिका.या मालिकेने संवादाच्या एका हळुवार बाजूला देखील स्पर्श केलाय.
      माझा मित्र रोहन जेव्हा बोरीवली स्थानकाबाहेर गर्दीतून चालत होता तेव्हा त्याला "पिंट्या" अशी हाक ऐकू आली त्याने मागे पाहिलं तर एक काकू आणि त्यांच्या सोबत एक अंध स्त्री उभी होती.त्या अंध काकूंना पिंट्या सोबत बोलायचे होते.ते जे बोलल्या ते खरच हृदयस्पर्शी होत..पिंट्या सोबत साऱ्या टीमलाच प्रोत्साहन देणार होत..त्या म्हणाल्या,"मी तुमची मालिका रोज 'ऐकते'...खूप सुंदर  सुरु आहे मालिका.सगळे चांगल काम करत आहेत. असाच काम करत रहा."
      हे प्रतिक आहे, संवाद हा केवळ दृश्य स्वरूपातच प्रभावी पणे होऊ शकतो असे नाही तर श्राव्य स्वरुपातही होऊच शकतो,
      मालिका हे मनोरंजनाचे माध्यम आहे परंतु मनोरंजनाच्या नावाखाली सध्या वाहिन्यांवर जे  काही स्त्रीवरील अन्याय,हाणामारी,सूड,कटकारस्थान याचं स्तोम माजलं आहे त्याला होणार सून मी ह्या घरची ही मालिका छेद देते.एक सुंदर प्रेमकहाणी दाखवल्याने आणि भारतीय समाज प्रेम कहाण्यांच्या प्रेमात असल्याने  ही मालिका आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
      थोडक्यात, माध्यमाचा प्रभावच एवढा आहे की त्यातील एखादी गोष्ट लोकांना 'हिट' झाली की ते त्या गोष्टीला 'सुपरहिट' करतात.


 

No comments:

Post a Comment