Wednesday, October 23, 2013

मालिकेचा पर्यायी, माध्यमाचा प्रभाव !!!

      संवादाच्या 'कल्टीवेशन' सिद्धांता नुसार,  व्यक्ती जर एखादी मालिका  खूप आत्मीयतेने बघत असेल.जर लोकांवर माध्यमाचा,मालिकेचा खूप मोठा पगडा असेल तर ती मालिका, त्या मालिकेतील पात्र लोकांना त्यांच्या आयुष्याचा एक भाग वाटू लागतात,मालिकेत घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या घटना त्यांच्या आयुष्याला प्रभावित करत असतात.आणि याच सिद्धांताचा प्रत्यय सध्या झी वर सुरु असणाऱ्या "होणार सून मी ह्या घरची" या मालिकेच्या निमित्ताने येतोय.
सध्या मराठी मनावर  या मालिकेने गारुड घातलय.याला कारण त्या मालिकेचा फ्रेश लूक, खऱ्या स्थळांवर होणार शूट,आणि पठडीतल्या मालिकांपेक्षा एक तरल प्रेमकहाणी या मालिके मुळे लोकांना पाहता येते.
    या मालिकेची लोकप्रियतेचा अंदाज फेसबुक या सोशल नेट्वर्किंग साईट वरील  मालिकेच्या वेब पेज वर मालिकेतील पात्रांना मिळणाऱ्या हजारो हिट्स आणि लाईक्स मधून येतो.
    मालिकेने  आणि पर्यायी त्यातील पात्रांनी प्रेक्षकांना इतकी भुरळ घातलेय की , त्यांच्यासोबत फोटो काढायला,त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आणि त्यांचे अभिनंदन करायला लोक अफाट गर्दी करतात.
     या मालिकेत जान्हवीच्या (मध्यवर्ती पात्र ) भावाची भूमिका साकारणारा रोहन गुजर हा आमचा कॉलेज पासूनचा मित्र..हल्ली त्याच्या सोबत फिरताना मालिकेच्या प्रसिद्धीचा प्रत्यय येतो.गणपतीत माझ्या गावी गेलो होतो तेव्हा त्याला पाहण्यासाठी,त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांनी एकाच गर्दी केली होती.वास्तविक तो माझ्या गावी येण्याची ही पहिली वेळ मुळीच नव्हती.तेव्हा त्याच्याकडे फारस लक्ष नसणाऱ्या याच लोकांनी आता त्याच्या भोवती गर्दी केली होती...माध्यमाचा प्रभाव!! इतर काय...आणि माध्यमचा विस्तार देखील  कळून येतो या घटनेतून...म्हणजे मालिकेने लोकप्रियतेच्या बाबतीत गाव,शहर,राज्य,देश या सीमा ओलांडल्या आहेत.
       लालबागच्या राजाला गेलो तेव्हा देखील हाच अनुभव.मुळात गणेशोत्सवात लालबाग-परळ भागात रात्रभर हजारोंच्या संख्येने लोक वावरत असतात...प्रचंड गर्दी.परंतु त्या गर्दीतही लोकांनी याला ओळखावे,फोटो काढावेत,अनेक प्रश्न विचारावेत,शुभेच्छा द्याव्यात याच त्याच्या सह आम्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होत.


           
        खर तर मालिकेच्या बाबतीत लोक  पात्र साकारणाऱ्या कलाकारांपेक्षा त्या मालिकेतील पात्रांवर प्रेम करत असतात.ते पात्र त्यांना जवळच वाटत असत. आपल्यातलच एक वाटत असत.पिंट्याच पात्र देखील लहान मुलांमध्ये जास्त लोकप्रिय आहे त्याच कारण  म्हणजे त्या पात्रांची बांधणी...मस्ती करणारा, अभ्यासाचा कंटाळा असणारा,बेशिस्त परंतु बहिणीच्या बाबतीत हळवा,प्रोटेक्टिव असा पिंट्या लहान आणि तरुण मुलांना भावण  स्वाभाविक आहे कारण  तो कुठेतरी त्यांना प्रतिबिंबित करत असतो.
        मालिकेतील जान्हवी आणि श्री ही आदर्शवादी पात्र आहेत.त्या दोघांविषयी महिला वर्गाकडून आलेल्या प्रतिक्रिया म्हणजे," अशी मुलगी किंवा मुलगा आम्हाला असाव अस वाटत." " आमच्या मुली ला देखील श्री सारखा  नवरा मिळावा म्हणजे आम्ही सुटलो" "श्री मध्ये आम्ही आमचा मुलगा पाहतो." मालिकेतील व्हिलन खऱ्या आयुष्यातही वाईटच असेल असा समाज आहे लोकांचा.


      एकूणच माध्यम लोकांवर किती प्रचंड प्रभाव टाकते याच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही मालिका.या मालिकेने संवादाच्या एका हळुवार बाजूला देखील स्पर्श केलाय.
      माझा मित्र रोहन जेव्हा बोरीवली स्थानकाबाहेर गर्दीतून चालत होता तेव्हा त्याला "पिंट्या" अशी हाक ऐकू आली त्याने मागे पाहिलं तर एक काकू आणि त्यांच्या सोबत एक अंध स्त्री उभी होती.त्या अंध काकूंना पिंट्या सोबत बोलायचे होते.ते जे बोलल्या ते खरच हृदयस्पर्शी होत..पिंट्या सोबत साऱ्या टीमलाच प्रोत्साहन देणार होत..त्या म्हणाल्या,"मी तुमची मालिका रोज 'ऐकते'...खूप सुंदर  सुरु आहे मालिका.सगळे चांगल काम करत आहेत. असाच काम करत रहा."
      हे प्रतिक आहे, संवाद हा केवळ दृश्य स्वरूपातच प्रभावी पणे होऊ शकतो असे नाही तर श्राव्य स्वरुपातही होऊच शकतो,
      मालिका हे मनोरंजनाचे माध्यम आहे परंतु मनोरंजनाच्या नावाखाली सध्या वाहिन्यांवर जे  काही स्त्रीवरील अन्याय,हाणामारी,सूड,कटकारस्थान याचं स्तोम माजलं आहे त्याला होणार सून मी ह्या घरची ही मालिका छेद देते.एक सुंदर प्रेमकहाणी दाखवल्याने आणि भारतीय समाज प्रेम कहाण्यांच्या प्रेमात असल्याने  ही मालिका आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
      थोडक्यात, माध्यमाचा प्रभावच एवढा आहे की त्यातील एखादी गोष्ट लोकांना 'हिट' झाली की ते त्या गोष्टीला 'सुपरहिट' करतात.


 

Monday, October 21, 2013

विचारांतून जगासमोर संवादित होणारा भारत !!!

           संवाद...माणसाच्या विचारसरणी नुसार,संस्कृती नुसार,त्याच्या भौगोलिक स्थानानुसार ,समजानुसार बदलत असतो...जर्मन भाषा येत असल्याने अनेक जर्मन भाषिक लोकांशी संवाद साधता आला... पाश्चिमात्य संस्कृती,त्यांच सामाजिक जीवन,त्यांची विचारसरणी,त्यांच्या आयुष्यातील संवादाचे महत्व जाणून घेता आल.बरच शिकताही आल. एकूणच जर्मन लोक हे जरा अंतर्मुख असतात.त्यांना भारतीयानसारख २४/७ कोणत्याही विषयावर  नाही बोलता येत...अर्थात ते थोडे आत्मकेंद्री देखील असतात म्हणा...पण मुळ मुद्दा हा की,'देश तसा वेश' या म्हणी नुसार प्रत्येक देशाची वागण्याची एक स्वतंत्र पद्धत असते आणि त्यांच्या बोलण्या वागण्यातून ती आपल्यापर्यंत पोहचत असते.आणि त्याचा आदर करणं,ती आहे तशी स्विकारण महत्वाच त्यातूनच परदेशी व्यक्तींशी मोकळा,आणि प्रभावी संवाद घडू शकतो...
         खर तर या विदेशी लोकांशी झालेल्या संवादाचे, वैचारिक देवाणघेवाणीचे अनेक किस्से आहेत पण आज एक किस्सा आवर्जून सांगावासा  वाटतोय...
         पुण्यात क्रेस्ट या प्रकाशन कंपनी सोबत काम करताना तिथे माझ्या डीपार्टमेंट मध्ये एक जर्मन आणि एक नेदरलंडची अशा दोन मुली ६ महिन्यांच्या  इंटरनशिप साठी  आल्या होत्या.आम्ही सगळे एकाच दिवशी रुजू झाल्यामुळे आमच एकमेकांसोबत चांगल जमल.मुळातच जर्मन लोकांना भारतीय जेवण आणि कपडे,दागिने याचं आकर्षण आहे.त्यामुळे प्रत्येक शनिवार-रविवारी त्यांची आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली जायची...मग त्याविषयीची त्यांची मते,विचार अशी चर्चा रंगायची..
             आमची एक शिफ्ट सकाळी ६.३० ते दुपारी २.३० अशी असायची.आणि अशाच एका सकाळी माझी जर्मन सहकारी ऑफिस मध्ये आली आणि रडूच लागली..तिला सावरलं आणि रडण्याच करणं विचारलं...तर तिने सांगितलेला प्रसंग म्हणजे भारतीय असण्याचा अभिमान बाळगणाऱ्या मला एक चपराक होती...
              आदल्या वीकेंड ला ती आमच्याच ऑफिस मधल्या दुसऱ्या एका गटासोबत अलिबाग ला गेली होती पिकनिक साठी...एकतर वेळेच्या बाबतीत आग्रही  असणाऱ्या जर्मन मानसिकतेला पहाटे तब्बल २ तास उशिरा बस सोडून भारतीयांनी तडा दिला होता...त्यात जर्मन लोकांचे, समुद्र किनारा म्हंटल्यावर उन्ह अंगावर घेत वाळूत पडून राहाण...वाचन करणं...वाटलच तर पोहायला जाणं हे ठरलेल समीकरण आहे.परंतु माझ्या देशबांधवाना एका फिरंगला 'आम्ही कशी मज्जा करतो पहा' हे दाखवण्यासाठी तिच्या मर्जी विरुद्ध पाण्यात पोहायला न्यायचे होते.तिने त्यांचे मन राखण्यासाठी तसे केलेही परंतु "आमच्या इतका वेळच तू पाण्यात राहिले पाहिजेस,मस्ती केली पाहिजेस" हा  त्यांचा  जिद्द वजा आग्रह होता...भरीस भर तिला पुरुषांकडून  वाह्यात अनुभव आल्यामुळे ती पाण्यातून बाहेर आली...तर तिला सरळ "तुझ्याकडे गट सांघिकता नाही...तू माणूस म्हणून फार वाईट आहेस" असे शेरे देण्यात आले...जवळपास ४०-५० लोकांसमोर...का तर तथाकथित भारतीय मौज मजेला अनुसरून ती वागली नाही...
           या साऱ्या प्रकारावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळेना...करणं मलाच प्रश्न पडले होते अनेक...कुठे आहोत आपण? काय सुरु आहे समाजात? का अशी मानसिकता होतेय? कधी सुजाण होणार आपण? जर आजचा तरुण आपल्या देशाच इतर देशांसमोर प्रतिनिधित्व करतोय तर काय अर्थ आहे "अशा "प्रतीनिधीत्वाला? "अतिथी देवो भव" असे मानणारे आपण... आपल्या देशात आलेल्या परदेशी पाहुण्यांना अशी वागणूक देऊन आपल्या संस्कृतीचे धिंदवडे काढत आहोत.." हा साध विचार ही न यावा लोकांच्या मनात...बर हे सगळ घडल कुठे तर विद्येच माहेरघर मानल जाणाऱ्या,संस्कृती जपण्याचे दाखले देणाऱ्या पुण्यामध्ये...
            संवाद हा केवळ शब्दांमार्फतच  नाही घडत.तो वागणुकीतून,विचारातून,देहबोलीतून देखील घडत असतो...आणि माझ्या देशबांधवांनी त्यांच्या वागणुकीतून साधलेला एका परदेशी "स्त्री" सोबतचा संवाद 'भारतात स्त्रियांना किती दुय्यम वागणूक दिली जाते.जर तुम्ही स्वतःची "पर्सनल स्पेस " जपलीत तर तुम्ही माणूस म्हणून कसे वाईट ठरता..." हेच सुचित करतो...  आणि जर आपल्याकडे संवाद हा असा घडत असेल तर मग कठीण आहे सगळ...
            माझ्या दुसऱ्या एका विदेशी सहकारी मैत्रिणीने तिचे भारतातले अनुभव,भारताविषयीचे विचार यांना आपल्या ब्लॉगद्वारे वाट मोकळी करून दिली आहे.
http://doriend.tumblr.com/
           
             मी नेमाने तिचा ब्लॉग वाचत आलेय.आम्ही बरेचदा त्यावर चर्चा देखील केलेय.तिने त्यात भारताविषयी...भारतीयांविषयी जे लिहिलंय ते वाचून मला तिचा राग नाही आला कधी...अर्थात मी तिला प्रोत्साहन देखील नाही दिल तिच्या लिखाणाविषयी...पण त्याने मला अंतर्मुख केल...विचार करायला भाग पाडलं...माणूस म्हणून जगताना,भारतीय म्हणून जगताना...आपण आपल्या देशाच्या असंख्य चांगल्या,अभिमान वाटावा अश्या बाजू जगापर्यंत पोहचवायच्या...त्यांना भारतातील चांगल्या आठवणी देऊ करायच्या की भारताची,"आपल्या देशाची" चुकीची प्रतिमा संवादित करायची हे आपणच ठरविले पाहिजे...ती आपली नैतिक जबाबदारी असली पाहिजे...या उपरे बोलणे नाही!!!
        
        
        

Saturday, October 19, 2013

कशासाठी ???....पोटासाठी.....



       आपण दररोज संवाद साधतच असतो...ओळखीच्या लोकांसोबत...कधी अनोळखी लोकांसोबत सुद्धा...पण या संवादाचे माध्यम दरवेळी शब्दच असले पाहिजेत असे नाही.... माणसाचे विचार, भावना बरेचदा ते कृतीतून व्यक्त होतात...किंबहुना जास्त प्रभावीपणे व्यक्त होतात...असाच एक संवाद...कोणत्यातरी संध्याकाळी घडलेला...खूप सुंदर व्यक्त झालेला...मला व्यक्त करून गेलेला....

        संध्याकाळी साधारण ५.३० -६ ची वेळ …ऑफिसमधून घरी परतण्यासाठी बसमध्ये चढले ..थोड्यावेळातच स्त्रियांकरता राखीव सीट वर बसायलाही मिळाले ..driver च्या मागचीच सीट ...१ -२ stop गेले असतील तर पुढच्या दारातून एक गृहस्थ बस मध्ये चढले... अंदाजे वय सांगायचंच झाल तर त्यांनी एव्हाना निवृत्त व्हायला पाहिजे होत किंवा ते झालेही असतील...माझ्या शेजारी ते उभे राहिले...
       कोणत्याही पुरुषाने त्यांना बसण्यासाठी जागा दिली नाही ; अर्थात त्यांनी ती मागितली ही नाही... तसेच एका हातात आपली पिशवी सांभाळत ते उभे होते...मनात असंख्य प्रश्न घेऊन...शरीरात प्रचंड थकवा घेऊन... न राहवून सवयी प्रमाणे मी त्यांना विचारूनच टाकलं..."बसायचं" ???...प्रश्न संपायच्या आत त्यांनी "नाही" सांगून मान फिरवली देखील...मीही मग शांतपणे कधी खिडकीतून बाहेर पाहत तर कधी त्यांचं निरीक्षण करत बसले...पण मनात मात्र अनेक प्रसंग...आणि प्रश्न यांनी दाटी केली होती...
      प्रवासात असे अनेक लोक दिसतात जे तुम्हा आम्हा सारखेच घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास करत असतात...पण फरक एवढाच आपण बहुतेक जण स्वतःच्या इच्छेने हा प्रवास करत असतो....स्वतःसाठी...आणि काही हा प्रवास करत असतात ते त्यांच्याकडे कोणताच पर्याय नसल्यामुळे...पोटासाठी....कुटुंबासाठी...
     का माहित नाही पण अशा माणसांना पाहिलं की मला माझे बाबा आठवतात...आणि टचकन डोळ्यांत पाणी भरून येत...मी हलकेच पुन्हा त्या गृहस्थांकडे पाहिलं,आता त्यांना बसण्यासाठी जागा मिळाली होती.ते डोळे मिटून बंद करून बसले होते...मी पुन्हा विचारांत गुरफटले गेले...काही दिवसांपूर्वीच असेच एक काका रस्ता ओलांडताना बावरले होते....
     तेव्हाही माझ्या मनात हाच एक प्रश्न आला होता जो आताही येतोय....कशासाठी हे सगळ ???.....घरी बसून आराम करण्याच्या वयात का ही माणस अशी या भयंकर घाईत असलेल्या गर्दीत पळण्याचा प्रयत्न करतात...??? कशासाठी ?? उत्तर एकच...पोटासाठी... 

       स्वतःच्याच नाहीतर सबंध कुटुंबाच्या पोटासाठी...सकाळी "आजचा दिवस कसा तरी निभावून ने " अशीच मागणी स्वतःकडे आणि देवाकडे करत बाहेर पडत असतील असे किती तरी लोक...अंगातला सगळा थकवा बाजूला सारण्याचा किंचित निष्फळ प्रयत्ननात...अजून थकण्यासाठी...पोटासाठी... 
       घरी बायको नेहमी प्रमाणेच अपेक्षा,चिंता,काळजी,प्रेम,हतबलता या सर्व भावनांचा एकत्रित मार सोसत असेल...सवयीप्रमाणे...आयुष्यात उमेदीच्या काळात डोळ्यांत रंगवलेल्या स्वप्नांच्या जागी कधी विवंचना भरून राहतात कळतच नाही...आणि मग सुरु होतो जगण्यासाठीचा किचकट प्रवास...माणसांच्या वाढलेल्या जंगलात,स्वतःला सावरतानाची होणारी हि नेहमीची कसरत नकोशी वाटत असली तरीही ती नित्यनेमाने करावीच लागते...कशासाठी तर पोटासाठी...
        तथाकथित "Corporate world" च्या व्याखेतही न बसणारे हे लोक रोज नव्याने प्रयत्न करत असतील आपल्या स्वाभिमानी कृतीतून सांगण्याचा कि, "आम्ही ही तुमच्यातलेच आहोत...अजून नाही थकलो आहोत... आम्हाला सहानुभूती दाखवू नका, सहकार्य करा. मागाहून हिणवण्यापेक्षा समोर आल्यावर केवळ अगदी खर-खुर आश्वासक स्मित करा..."
       खरच आयुष्याच्या रहाट गाड्यात विश्रांतीचे जे काही क्षण यांच्या वाट्याला येत असतील तेही खर्चाची गोळा बेरीज करण्यातच जात असतील. मुलाच शिक्षण, मुलीचं लग्न,बायकोच दुखण, भावाचा संसार,आई बाबांना आधार... हे सगळच पहायचं असतं... कितीही दमायला झालं तरीही आयुष्य रेटायच असतं...सगळ्यांना जमेल तितक देत असताना इतरांकडून त्यांची केवळ अपेक्षा असावी ती म्हणजे त्यांनाही इतरांनी आपल्यात सामावून घेण्याची...

     कदाचित, याच भावनेने असेल दररोज रिक्षावाले, बस conductor किंवा रस्ता ओलांडताना भेटलेल्या काकांच्या रूपातल्या अशा बऱ्याच लोकांना पाहून अपोआप स्मित उमलत चेहऱ्यावर...त्यांना मनोमन सांगणार..."काका आम्ही ही धावतोय...स्पर्धेत टिकून राहण्यासाठी...आणि पर्यायी तुमच्याच सारख पोटासाठी...





Thursday, October 17, 2013

सामाजिक प्रबोधन - माध्यमांची जबाबदारी !!

      मुंबईच्या लोकल ट्रेन चा प्रवास म्हणजे अनुभवांची साखळीच असते....दर प्रवासात काहीना काही अनुभवायला,शिकायला मिळत...कधी ते अनुभव चेहऱ्यावर हसू आणतात तर कशी लोकांची मानसिकता पाहून हतबल व्हायला होत...असाच एक अनुभव आज ट्रेन मध्ये आला. 
      माझ्या समोरच्या सीटवर बसलेली एक बाई...मांडीवर एक दीड दोन महिन्यांची मुलगी...सोबत एक साधारण दीड-२ वर्षांची आणि ५-६ वर्षांची अशा अजून दोन मुली...तिच्याच...बर तिची आर्थिक परिस्थिती पण बेताचीच वाटत होती.आधी दोन मुली असताना गर्भधारणेचा अजून एक चान्स त्या बाईला का घ्यावासा वाटला? म्हणजेच तिला, तिच्या घरातल्यांना so called "वंशाचा दिवा" पाहिजे असणार हे निश्चित होत...माझ विचारांचं चक्र सुरु झाल होत एव्हाना...कधी संपणार हे सार...कधी कळणार लोकांना आपली नैतिक, सामाजिक जबाबदारी...बर जो वंश आपण वाढवू पाहतोय त्याच्या पूर्वजांनी त्यांच्या भावी वंशाच्या सदृढ- सुखी आयुष्याची तरतूद केली आहे का? मला कोणाच्या आर्थिक परिस्थितीवर बोलण्याचा हक्क नाही...परंतु आपण जन्माला घालणाऱ्या मुलाला जर चांगल अन्न, आरोग्य,शिक्षण या मुलभूत सोयीच नाही देऊ शकत तर मग काय अर्थ उरतो या साऱ्या धडपडीला...
          विचारांची साखळी तोडणारा एक आवाज कानी पडला....शेजारी बसलेल्या एका बाईने त्या तीन मुलींच्या आईला "तिन्ही मुलीच का?" असा प्रश्न विचारला..."हो" उत्तर देताना त्या बाईच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव नजरेतून सुटू शकले नाही..माझे विचार आत्ता दुप्पट वेगाने फिरू लागले....
     कुठे आहोत आपण ? कधी  थांबणार हे सार ? कधी घडणार प्रबोधन ? का स्त्रीलाच स्त्री नको असते ? भार वाटते ? असे असंख्य प्रश्न... माध्यमाचा  वाढता प्रभाव...त्यांद्वारे राबवलेली सरकारची स्त्री भ्रूण हत्येविरोधी मोहीम...या पार्श्वभूमीवर ट्रेन मधला हा प्रकार म्हणजे so called  liberal आयुष्य जगणाऱ्या, बदल घडत आहे अशी धारणा असणाऱ्या माझ्यासारखीला धक्कादायक होता.
     मग हळूहळू या प्रश्नांची उत्तरे शोधायला लागले...ज्या स्त्रियांमध्ये हा संवाद घडला त्या मुळातच शिक्षण, त्यातून घडलेले सकारात्मक,आधुनिक बदल यांपासून काही वंचित राहिलेल्या गटामध्ये मोडणाऱ्या होत्या.घरी केबल नेटवर्क  जरी असले, तरी त्याचा वापर स्त्रीला गौण लेखणाऱ्या, अन्याय करणाऱ्या, सोशिक स्त्री उभी करणाऱ्या मालिकाच पाहण्यासाठी केला  जात असणार.मग अशा समाज घटका पर्यंत स्त्री साठी राबवली जाणारी मोहीम पोहचत तरी असेल का? इंटरनेट,सोशल नेट्वर्किंग साईट्स हे शब्दच ज्यांच्या गावी नाहीत त्यांना समाजातील या प्रबोधनाचे काय कौतुक?
    खरतर "वंशाचा दिवा " ही आपल्या समाजाला लागलेली अनेक वर्षापासूनची अळी आहे.तिने समाज हितवादी विचारांना इतके पोखरले आहे कि आत्ता त्यातून समाजाची सुटका करायची असेल तर पार तळागाळापर्यंत प्रबोधन पोहोचणे आवश्यक आहे.त्यासाठी सरकारने अधिक व्यापक धोरण स्वीकारणे गरजेचे आहे.आणि म्हणूनच माध्यमाच्या प्रत्येक अंगाचा वापर होणे अपरिहार्य आहे.माध्यमाचे पारंपारिक प्रकारही या मोहिमेत मोठे योगदान देऊ शकतात.हे ध्यानात घेऊनच वृत्तपत्रे, होर्डींग्स,रेडीओ, सार्वजनिक भिंतींचा वापर तसेच वाहिन्यांवर जनहितार्थ राबवल्या जाणाऱ्या जाहिराती अशा माध्यम अंगांचा जास्तीत जास्त वापर करून घेणे अनिवार्य आहे.   
    कारण जर संवादातून होणारा माहितीचा प्रसार सर्वदूर व्हावयास हवा असेल तर तो समाजातील प्रत्येक स्तरांत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे.आणि तरच परिपूर्ण संवाद घडून प्रबोधन घडण्यास मदत होईल!!!
   

Tuesday, October 15, 2013

"कणा"

        नववीत असताना कुसुमाग्रजांची "कणा" ही कविता अभ्यासक्रमात होती...खरतर ही कविता प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आहे.खूप साध्या शब्दात मांडलेली  ही कविता...स्वाभिमान जपणं शिकवणारी...कठीण परिस्थितीतही जगण्याचे बळ देणारी...शाळेत शिकलेली ही कविता आयुष्यभरासाठी पाठ होऊन गेली कारण तिचा आशय...तिच्यातून  मिळणारी प्रेरणा आणि तिचा साधेपणा !!!
 
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhir-J2iNKTevFomy25HxASw3YEwnJ0vLBgloJfaetQgLh7GxAecnD6lOaLCFgSxgIuxUMITli_ZIyaoyZ7QbKe53qmOYhWdj2Hk-4zRiOfQhuv1WLF-depcLUmwVaNeBIzYafJwlvM7I0/s1600/1503.jpg
   
     तर, नव्याने संसार थाटलेल्या घरात गंगा नदीच्या पुराचे पाणी येते आणि  संसार उध्वस्त होतो..होत्याचे नव्हते  व्हायला काही क्षण पुरतात आणि शेवटी डोळ्यांतही आसवांचा पूर ओसंडून वाहू लागतो.अशा या परिस्थितीत त्या मुलाला मायेने आपल्यावर हात फिरवणारे,प्रसंगी धीर देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे शिक्षक आठवतात.
    तो सरांना भेटून  सारी कहाणी सांगतो.ते ऐकून सरांचा आपसूक पैशांची मदत करण्यासाठी  खिशाकडे जाणारा हात पाहताच तो सरांना अडवतो आणि म्हणतो, "मी तुमच्याकडे आर्थिक नाही तर मानसिक मदत मागायला आलोय.एकटेपणा जाणवत होता म्हणून धीराचे दोन शब्द ऐकायला आलोय.माझा संसार जरी मोडून पडला असेल तरी माझा पाठीचा कणा (स्वाभिमान) अजूनही ताठ  आहे.तुमचा आशीर्वाद फक्त द्या पुढची लढाई मी लढू शकतो." असा आशय असलेली ही कविता साऱ्यांनाच आयुष्यात प्रेरणादायी वाटते.
    संवादाच्या रिसेप्शन सिद्धांता नुसार, कवितेचा अर्थ वाचणाऱ्याच्या  मानसिकतेनुसार आणि त्याच्या अनुभवानुसार बदलत असतो.परंतु कुसुमाग्रजांची ही कविता मराठी माणसाच्या जवळ असण्याच कारण म्हणजे प्रत्येक मराठी मनाला ही कविता जगण्याच धैर्य देते.एक नवीन आशा निर्माण करते,वाचणाऱ्याच्या  मानसिकतेनुसार तिचा प्रभाव वेगळा ठरू शकतो परंतु आशय हा बदलत नाही.आणि म्हणूनच ती साऱ्यांनाच जवळची वाटते.


Friday, October 11, 2013

माध्यमांचा असाही "हिट" वापर !

   

      विकसित तंत्रज्ञान आणि माध्यमांची लोकप्रियता यांमुळे आपली मते व्यक्त करण्यासाठी हल्ली तरुण सोशल नेट्वर्किंग साईट्स चा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.फोटो शॉप, कोरेल ड्रो सारख्या विकसित तंत्रांचा वापर करून आपले विचार अधिक प्रभावशाली बनवण्याकडे लोकांचा कल असतो.आणि याच माध्यमाचा वापर तरुण आपले सामाजिक,संस्कृती, राजकीय क्षेत्रातील घडामोडीन विषयी मत प्रदर्शनासाठी देखील पुरेपूर करतात.
       या पावसाळ्यात एक फोटो साऱ्याच नेट्वर्किंग  साईट्स वर लोकप्रिय ठरला.या फोटोला अनेक "हिट्स" आणि "लाईक" मिळाले.सध्या सुरु असलेला निवडणुकांचा काळ पाहता राजकीय नेत्यांनी सामान्य  जनतेला देऊ घातलेल्या सुविधांवर हास्यास्पद टीका करणारा ,रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली दुर्दशा,विनोदी शैलीत मांडणारा हा फोटो...


                    

         निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ,एरवी सामान्य माणसाकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या  राजकीय नेत्यांच्या कधीच पूर्ण न होणाऱ्या आश्वासनांचे हंगामी पिक भरभरून येते.परंतु सरकारचा हा दुटटपीपणा सामन्य जनतेच्या चांगलाच लक्षात आल्याने कधी विनोदी,कधी जहाल तर कधी मार्मिक भाष्य  करत , "आम आदमी" सरकारवर कुरघोडी करत असतो.त्याचेच एक उदाहरण म्हणजे वरील फोटो...तो अनेकदा अनेक लोकांकडून माझ्या पर्यंत आला...दरवेळी फरक एवढाच की .., विरारच्या जागी  जोगेश्वरी,मालाड,अंधेरी...अस वेगळ ठिकाण लिहील जात होत.
         थोडक्यात,लोकशाहीच्या पडद्या आड  राजकीय नेत्यांची हुकुमशाही आणि सामान्य माणसाची पिळवणूक सुरु असतानाच सोशल नेट्वर्किंग साईट्स  च्या माध्यमातून सुरु असलेली सरकार विरोधी उपरोधिक मोहीम काही अंशी तरी सफल होऊन सरकारला किमान जाग येईल, याच आशेवर आजचा तरुण तगतो आहे...त्याच्या या प्रयत्नाला आणि आशेला यश येवो हीच अपेक्षा!!!