Thursday, September 19, 2013

उत्सवाच्या माध्यमातून जाहिरातींची रेलचेल....

      गणेशोत्सवाच्या धामधुमीत अगदी काही महिन्यांवर येउन ठेपलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाच्या जाहिरातबाजीत सारेच गुंतलेले दिसले. गणपती दर्शनासाठी गेले १० दिवस प्रामुख्याने रात्री हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरणाऱ्या जनसमुदायाला 'टार्गेट' करून त्यांचे लक्ष आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सारेच करत होते.
      त्यासाठी होर्डींग्स  , मोठ मोठे flex  यांचा वापर मुख्यत्वे करण्यात आला.सारे रस्ते रोषणाई आणि होर्डींग्स ने भरून निघाले होते. प्रत्येक पक्ष आपापल्या त्या विभागातील प्रतिनिधींना प्रमोट करत होता.निवडणुका लक्षात घेता नवनवीन (नुसतीच) आश्वासने देत होता.
       त्यापैकी काही होर्डींग्स लक्षवेधक होती.सध्या सर्वत्र चर्चेचा खरतर काळजीचा विषय असणाऱ्या 'स्त्री संरक्षणाचा' मुद्दा उचलत मनसेने " स्त्री रक्षणासाठी १० लाख खर्चीणार" अशी घोषणा आपल्या होर्डींग्स द्वारे करून टाकली. त्यात स्त्रियांसाठी कराटे क्लासेस, self  defense कसा  करायचा याचे विविध क्लासेस सुरु करण्यावर त्यांनी भर दिला होता.

   
        शिवसेने ने तर लालबागच्या राजाच्या मंडळा समोरच पक्षाचा छोटा मंडप तयार केला होता आणि तिथे स्थानिक कार्यकर्ते स्वतःच्या पक्षाला प्रमोट करण्यात गुंग होते.त्यांना  गर्दीतले शिवसैनिक  प्रतिसाद ही देत होते.तिथेच पक्षाची "Marketing Strategy " यशस्वी होताना दिसली.
         उत्सवाच्या  धर्तीवर माध्यमाचा वापर योग्य त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने  योग्य त्या वेळी करून खरतर सर्वच पक्षांनी आपला कार्यभाग साधला.पण माझे सर्वात जास्त लक्ष वेधले ते भाजपा च्या एका होर्डिंग ने ...फक्त माझे नाही तर साऱ्यांचेच...
         गेले काही दिवस भाजपा सोबत साऱ्या राजकीय रिंगणातच नव्हे तर मिडिया  आणि त्याद्वारे सबंध देशभर गाजत असलेली नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदासाठीची उमेदवारी  हा सर्वांच्याच उत्कंठेचा विषय लक्षात  घेऊन भाजपा ने आपल्या पक्षाची परिणामी मोदींची केलेली जाहिरात लक्षवेधक ठरली यात शंका नाही...            कदाचित गुजरात मध्ये मोदींना मिळणारा मान सन्मान आदर लक्षात घेऊन त्यांचे तेथील  लोकांच्या मनातील अढळ आणि सर्वोच्च्य स्थान महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर बिम्बवण्यासाठी,  हे होर्डिंग design केले असावे.


         वरील होर्डिंग मध्ये मोदींचा फोटो छापून त्या शेजारी "श्री गणेशाय नमो नमः " असे लिहिले होते.त्यातील "नमो नमः" हे मोठ्या अक्षरात छापले होते...कारण काय असावे तर ,"नमो" म्हणजे नरेंद्र मोदी...असे त्यांना त्यातून अभिप्रेत करायचे होते.थोडक्यात 'नरेंद्र मोदींचा विजय असो' हे त्यांना सुचवायचे होते.माध्यमाचा असा कल्पक वापर करून जनतेला आकर्षित करण्याचा भाजपचा  मनसुबा साध्य झालाय हे मात्र एकदम नक्की!!!
       थोडक्यात, येऊ घातलेली निवडणूक काय निकाल देईल नाही माहित परंतु देशभरातील या सणासुदीच्या हंगामात आपले घोडे पुढे दामटवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करत आहे.आणि त्यासाठी माध्यमाच्या प्रत्येक अंगाचा वापर शक्य तितक्या मोठ्या प्रमाणावर करण्यावर प्रत्येक पक्षाचा  भर आहे हे मात्र निश्चित !  

Thursday, September 5, 2013

कविता आणि लोक



           कविता लिहायला लागले तेव्हा पासून एक गोष्ट खूप सहज मनात... डोक्यात रुतून बसली की, कविता ही स्वतःचा लहरी स्वभाव घेऊनच जन्मास येते...म्हणजे सुचली तर पार दोन मिनिटांत शाई होऊन कागदावर उमटते, तर कधी कधी प्रयत्न करूनही पान कोरंच राहत किंवा कविता अर्ध्यात साथ सोडून निघून जाते...बर कागदावर माझ्या  रंगात रंगून उतरलेली माझी कविता वाचणार्याची कधी होऊन जाते कळतही नाही...वाचणारा त्याच्या बुद्धी प्रमाणे,भावने प्रमाणे,दृष्टी प्रमाणे तिचा रंग बदलत असतो...अर्थ शोधत आणि बदलत असतो...हे अर्थ बदलण्याचे अनुभवही बरेच आहेत माझ्या गाठीशी...
      नववीत असताना एक चारोळी केली होती,माझं आणि देव बाप्पाचं नात सांगणारी...
त्याच्या  विषयीचा माझा विश्वास व्यक्त करणारी...पण ती चारोळी एका कौटुंबिक सोहळ्यात माझ्या एका नातेवायीकाने वाचली आणि माझ्या आईला लागलीच, "बघा हान बाहेर काही सुरु आहे का हीच..." अस अतिशय संकुचित बायकी वृत्ती दाखविणार विधान करून माझ्या आईला बुचकळ्यात पडण्याचा निरर्थक प्रयत्न केला...आई सह कोणीच फारशी मनावर घेतली नाही म्हणा 'ती' गोष्ट...
      कॉलेज मध्ये असताना ओघानेच प्रेम कविता लिहीण आलंच...म्हणजे मुळातच वर सांगितल्या प्रमाणे कविता अशी ठरवून नाही लिहू शकत आपण...ती तिला पाहिजे तेव्हाच सुचते आपल्याला...तो वयाचा side  effect  म्हणा...वय वर्ष १५ ते पुढे आपण स्वतःला तरुण मानू तोवर प्रेम कविता  या सुचतातच...तशा मलाही सुचल्या आणि त्या कधी चुकून प्रेमात नव्यानेच उडी घेतलेल्या लोकांसमोर वाचून  दाखवल्या कि त्यांच्या तोंडून येणार हमखास वाक्य..."अरे मला exactly  हेच म्हणायचं असत माझ्या girl friend  किंवा boy friend  ला...तुला कस नेमक माझ्या मनातल कळलं ? तुही प्रेमात पडलीस का??"...मी हसूनच "नाही" म्हणायचे...मस्त वाटायचं ते ऐकून...आपण कोणाच्या तरी भावना  express  होण्याचे माध्यम  होतो हे पाहून...      
      मला नेहमीच कविता हे स्वतःला express  करण्याचे ...स्वतःच स्वतःशी संवाद साधण्याचे ...लोकांच्या भावना आपल्याश्या करून त्यांना वहीवर उतरवण्याचे  एक हक्काचं साधन वाटल्या आहेत...मग ती एक प्रेम कविता असो सद्य परिस्थितीचा आढावा घेणारी कविता असो...कविता ही तुम्हाला प्रतिबिंबित करत असते... अशीच एक कविता लिहिली होती २०११-२०१२ मधेच कधीतरी, मग तीच कविता bloggers  वर share केली... 

     

मनाच्या कोपऱ्यात
गुपचूप दडलेलं
कोणाला कळूच नये
म्हणून खोलवर कोंडलेल... दुःख!


        सहनशीलतेचा अंत होऊन
        रागात माखलेलं
        डोळ्यांच्या न्हाणीघरात
        आसवांत न्हालेल... दुःख!


स्वप्न म्हणून कुरवाळलेल
वास्तव म्हणून झिडकारलेल
मोहाच्या सापळ्यात
शिकार होऊन अडकलेल... दुःख!


        घाईने निर्णय घेतलेलं
        निर्णय घेण्यात वेळ दवडलेल
        अव्यक्त, अबोल भावनांनी
        उमलण्या पूर्वीच कोमेजलेल... दुःख!


दूरवर पाहता पाहता
जवळच पाहण राहून गेलेलं
सुखाच्या शोधात फिरताना
हातून सुखच अलगद निसटून गेलेलं ... दुःख!


           अपेक्षेने लादलेल
           नैराश्याने फोफावलेल
           आयुष्य संपवण्याचा
          सोपा मार्ग स्वीकारलेल... दुःख!


दारिद्र्याने गांजलेल
भ्रष्टाचाराने पोखरलेल
अस्तित्वाच्या लढाई मध्ये
क्षणोक्षणी हरलेल... दुःख!


            'आहे कि नाही' या
             प्रश्नाच उत्तर होऊ न शकलेल
             मरण नाही म्हणून जगण्याची
             जखम होऊन बसलेलं... दुःख!


प्रत्येकाच्या आयुष्यात आलेल
येताना बहुरूपी झालेलं
जाताना जगण  शिकवलेलं... दुःख!
           

      ही कविता जेव्हा post  केली तेव्हा मला आलेल्या प्रतिक्रियांवरून एक गोष्ट खूप खात्रीदायक पटली ती म्हणजे  कविता चांगली कि वाईट हे  नंतर  ठरवतात लोक सगळ्यात आधी त्या कवितेवरून कविता लिहिणार्याच्या मनात...डोक्यात...आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न कविते मार्फत नक्की करतात...आधीच सांगितल्या नुसार कविता ही वाचणार्याची होऊन जाते...या कवितेच ही तसच झालं...म्हणजे जे नित्याने वाचन करतात त्यांनी "चांगली".."उत्तम"..."सुंदर" अशा शब्दांत दाद दिली तर...काहींनी ज्यांना वाचनाची किमान आवड आहे त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्या पूर्वी "तुझ्या आयुष्यात खूप दुखद असं काही घडल आहे का?"..." इतक depressing लिहिलयस... काही झालाय का?" एवढच नाही तर, "अग ऐक...लग्न करून टाक म्हणजे असं दुखावर  लिहायचं बंद करशील"...अशा शंका-कुशंका,प्रश्न यांची सरबत्तीच सुरु केली...आणि सगळ्यात शेवटी "बरी आहे कविता" असं जुजबी कौतुक केलं. 
      म्हणजे दुक्खावर कविता लिहिली कि तो माणूस दुखी कष्टीच असतो हा सोप्पा निष्कर्ष काढून लोक मोकळे होतात..किंवा लग्न हाच सर्व दुक्खांवर so  called रामबाण उपाय आहे अस मानून बसतात...प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा आणि म्हणूनच निष्कर्ष ही वेगळे आणि त्यावर आपला control नसतो...        
      मुद्दा एकच की, कविता फक्त लिहावी....तिचा आशय शोधण्याचा आणि स्वतःला गवसलेला आशय  लोकांवर लादण्याचा  फारसा अट्टाहास धरू नये...कविता आणि लोक...त्यांचं ते बघून घेतील !!!